शाहू महाराज

भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूरचे छत्रपती

शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहूचौथे शाहू नावांनी[१] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[२][३][४]

लोकराजा क्षत्रियकुलवतंस श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज आबासाहेब
छत्रपती, राजर्षी , लोकराजा
शाहू महाराजांचे छायाचित्र
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळइ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहणएप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्तीकोल्हापूर जिल्हा
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शाहू महाराज भोसले
जन्मजून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर
मृत्यूमे ६, इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारीछत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
'राजाराम ३
उत्तराधिकारीछत्रपती राजाराम भोसले
वडीलआबासाहेब घाटगे. ... .
आईराधाबाई .. .
पत्नीमहाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणेघाटगे,भोसले
राजब्रीदवाक्यजय भवानी

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.

शाहू महाराज हे राजवाड्यातील नोकरांसोबत बसले आहेत. ता. १८९४

जीवन संपादन

राजर्षी शाहू महाराज

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[५] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.[६]

महाराणी लक्ष्मीबाई भोसले संपादन

'''अखंड सौभाग्यवती वज्रचुडेमंडित श्रीमंत महाराज्ञी लक्ष्मीबाई साहेब छत्रपती आईसाहेब महाराज'''

महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सुविद्य पत्नी आणि राजाराम छत्रपतींच्या मातोश्री आईसाहेब महाराज होत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात त्या सहभागी होत्या. छत्रपती शाहू महाराजांची सत्यशोधक विचारसरणी, अस्पृश्यता निवारणाचे कार्य, धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि शिक्षणप्रसार ही तत्त्वप्रणाली त्यांनी स्वतः तर जपलीच; शिवाय पुत्र राजाराम महाराजांना त्यांच्या कार्यामध्ये सक्रिय पाठिंबा व आधार दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला.

महाराणी लक्ष्मीबाई ऊर्फ आईसाहेब महाराज यांचा जन्म 1 जानेवारी 1880 रोजी बडोदा येथे झाला. बडोद्याचे श्रीमंत गुणाजीराव खानविलकर यांच्या त्या कन्या. 1 एप्रिल 1891 रोजी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचा विवाह संपन्न झाला आणि महाराणी म्हणून त्या कोल्हापुरास आल्या.

महाराणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वैवाहिक जीवन सुखी व संपन्न होते. त्यांना तीन मुले राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज, राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी. शाहू महाराजांचे आपल्या पत्नीवर नितांत प्रेम होते. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना 1907 मध्ये सुरू केली होती. धरणाच्या कामाचा शुभारंभ महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते करण्यात आला. त्या तलावाला शाहू छत्रपतींनी आपल्या पत्नीचे नाव ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ तसेच धरणाला ‘राधानगरी’ असे आपल्या मुलीचे नाव दिले. फेजिवडे गावाजवळ, राधानगर नावाचे गावही वसविले.

महाराणी लक्ष्मीबाई स्वभावाने अतिशय कनवाळू, धीट व करारी होत्या. शाहू महाराजांच्या पत्नी म्हणून त्या त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी जाणून घेत व त्याप्रमाणे वागत. त्यांना काय हवे, काय आवडते, त्या प्रकारचे पदार्थ बनवीत. त्यांना आयुर्वेदाचे चांगले ज्ञान होते. त्या आपल्या नोकरांच्या कुटुंबांना व नातलगांना त्यांचे हितचिंतक म्हणून औषधांचे सहाय्य करीत असत. सर्वांच्या बरोबर मिळून-मिसळून वागण्यात, इतरांना समजून घेण्यात त्या तरबेज होत्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये संस्थानचा राज्यकारभार स्वीकारला. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, पुरोहित शाळा सुरू केल्या.

त्या काळी अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच; पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे आदी ठिकाणीही प्रवेश करण्यास त्यांना मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला. अस्पृश्य तरुणांना मोटार ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या, महाराणी साहेबांच्या, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर नेमले. पट्टेवाले, शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतःचे शरीर-रक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्यांना त्या मानाने कारकून, रजिस्ट्रारच्या जागा दिल्या. महात्मा फुले यांचा अस्पृश्योद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.

या हरिजन नोकरांना राजवाड्यावर थेट स्वयंपाकघरापर्यंत जाण्याची परवानगी होती. ही त्या काळाची मोठीच गोष्ट होती. महाराणी लक्ष्मीबाईंना खास सूचना होत्या की, एखादा हरिजन त्यांच्या दर्शनासाठी आला तर त्यांना त्यांच्या पायांना स्पर्श करण्यास त्यांनी अनुमती द्यावी. महाराणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पतीचे हे अस्पृश्यता निवारणाचे धोरण हसत-खेळत स्वीकारल्याचे दिसून येते. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 1994, पृ.333)

शाहू महाराज अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपल्या कुटुंबापासून प्रयत्न करत होते. याबाबत गंगाराम कांबळे यांनी एक आठवण सांगितली आहे – एकदा महाराज शिरोळला शिकारीला गेले होते. तेव्हा महाराजांनी चहासाठी म्हणून शिरोळच्या महारांना त्यांच्या तक्यात सर्वांची सोय करावयास सांगितली. महारांना आपल्या घरात घेण्यापेक्षा सुद्धा त्यांच्याच घरात आपण जाऊन जेवण किंवा फराळ करणे, ही बरीच पुढची पायरी होती. त्यातही महाराज शिरोळच्या तक्यात एकटेच गेले नाहीत, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना यात सहभाग घेता यावा म्हणून हळदी-कुंकू समारंभ करायला लावला व त्या ठिकाणी महाराणी लक्ष्मीबाईसाहेब, कन्या आक्कासाहेब महाराज व सून इंदूमतीदेवी यांना मुद्दाम बोलवून घेतले व इंदूमतीदेवींना तेथे चार शब्द बोलायलाही लावले. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, पृ. 753)

छत्रपती शाहू महाराजांप्रमाणेच अस्पृश्यता निवारण व मागासवर्गीयांना शिक्षण देण्याच्या कार्यात महाराणी लक्ष्मीबाई याही सक्रिय होत्या. मागासलेल्या जातीच्या स्त्रियांच्या शिक्षणाची कोल्हापुरात सर्व प्रकारची सोय करणारा हुकूम त्यांनी काढला ः

ता. 8 आक्टोंबर 1919 इसवी. हुजूर सरकारचा मु.6. नं 354 चा होऊन लगत मु.जा. नं 264 ता. 6 माहे आक्टोंबर 1919 इसवी आज्ञा झाल्याआधारे सर्व लोकांस कळविण्यास प्रसिद्ध करण्यात येते की, श्रीमान सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित मातोश्री लक्ष्मीबाई छत्रपती महाराणी साहेब यांनी कृपाळू होऊन आज्ञा केली आहे की, मागासलेल्या लोकांना पडदा नाही, तेव्हा मागासलेल्या जातीतील बायका ज्यांना विद्या शिकण्याची इच्छा असेल, त्यांनी मामासाहेब सुर्वेयांच्याकडे अर्ज करावेत, म्हणजे ते त्यांची बोर्डिंगची व लॉजिंगची सर्व व्यस्था करतील. (करवीर सरकारचे गॅझेट भाग 1 दि. 11 आक्टोंबर 1919)

कोल्हापुरात घडलेल्या वेदोक्त प्रकरणांनतर शाहू महाराजांनी बहुजन समाजातील पुरोहित तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 6 जून 1920 मध्ये धार्मिक विधींचे शिक्षण देण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालया’ची स्थापना केली. सर्व जाती-धर्मातील तरुण पौरोहित्याचे प्रशिक्षण घेऊ लागले. पूर्वी जेथे भट-पुरोहितांशिवाय पान हलत नसे, तेथे भटा-ब्राह्मणांना न बोलवता हे विधी पार पाडले जाऊ लागले. सत्यशोधक समाजाच्या वतीने अनेक सहभोजनाचे कार्यक्रम पार पडू लागले.

याबाबत भास्करराव जाधव यांनी सांगितलेली एक आठवण महत्त्वाची आहे – ब्राह्मण पुरोहितांची धार्मिक मक्तेदारी काढून टाकून तेथे मराठा पुरोहितांना बसविणे हे काम शाहू महाराजांनीच केले. आज जरी ही गोष्ट फारशी महत्त्वाची वाटत नसली तरी त्या काळी ती क्रांतिकारक होती. छत्रपती शाहू महाराजांनी ‘क्षात्रजगद्गुरू’चे पद निर्माण केले. शिवाजी वैदिक स्कूलमधून मराठा पुरोहित तयार केले, तरीही नवीन पुरोहितांच्यावर सामान्य जनतेचा विश्वास बसणे गरजेचे होते. सनातनी मराठ्यांना सुद्धा ‘मराठा पुरोहित’ ही गोष्ट मान्य नव्हती. पण महाराजांच्या दडपणामुळे त्यांना नमते घ्यावे लागत होते.

खुद्द महाराजांच्या राजवाड्यातही ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यातील खासगी देवालयातील ब्राह्मण पुजाऱ्यास महाराजांनी काढून टाकले. पूजा-अर्चा, धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी मराठा पुरोहितांकडून चालू केले. राजवाड्यातही सर्वांना मराठा पुरोहितांकडून विधी करवून घ्यावेत, अशी सूचना केली, तरीसुद्धा ब्राह्मण पुरोहितांच्या बाबत निर्णय घेण्यास महाराणी टाळाटाळ करीत होत्या. यासाठी महाराजांनी एक युक्ती योजिली. महाराणींच्या ब्राह्मण पुरोहितास त्यांनी ‘मत्स्यपुराण’ वाचावयास सांगितले. हे पुराण नवरा-बायकोने मिळून ऐकावयाचे असते, असा महाराणींना निरोप पाठविला. ‘मत्स्यपुराणा’तील ‘अनंगदान’ व्रत ब्राह्मण पुरोहित वाचू लागला व त्याचा अर्थ मराठीत सांगू लागला.

त्या आख्यानात ब्राह्मणाला पतिव्रता स्त्रीने आपला देह अर्पण केला असता पुण्य लाभते, असे लिहले आहे, हे ऐकताच महाराणी एकदम खवळून उठल्या. म्हणाल्या, “हे पुराण बंद करा. मला हे ऐकावयाचे नाही आणि उद्यापासून ब्राह्मण पुरोहितांना आपल्या दारात पाऊल टाकू द्यावयाचे नाही.” महाराज म्हणाले, “आज म्हणाल व उद्या परत बोलवाल. मग तो आला नाही म्हणजे आपले नडून बसेल.”

“नाही, मी पुन्हा ब्राह्मण पुरोहितांना बोलावणार नाही. जगदंबेची शपथ घेऊन सांगते, मी आता कधी बदलणार नाही.”

यानंतर महाराजांच्या निधनानंतर सुद्धा ब्राह्मण पुरोहितांना कधीही बोलविले नाही. (माधवराव बागल-शाहू महाराजांच्या आठवणी,पृ. 161). आईसाहेब महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांच्या योजना व त्यांनी घालून दिलेली तत्त्वे त्यांच्या पश्चात तंतोतंत पाळल्याचे दिसते व अनेक गोष्टींमध्ये धीरोदात्तपणे खंबीर राहून महाराजांची तत्त्वप्रणाली जोपासल्याचे जाणवते.

इ. स. 1917 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती कायदे मंडळात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून एक विधेयक आणले. सनातनी मंडळींनी या बिलाला विरोध केला. शाहू महाराजांनी पटेल बिलाला ठोसपणे पाठिंबा दिला. त्याच वर्षी मिश्र विवाहांना मान्यता देणारा कायदा आपल्या संस्थानमध्ये पास केला. मणभर उपदेशापेक्षा कणभर कृती अधिक महत्त्वाची असते. महाराजांचे वर्तन बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥ या उक्तीला साजेसेच होते. त्यांनी इंदूरच्या धनगर जमातीतील राजघराण्याशी आपल्या घराण्याचे सोयरेसंबंध घडवून आणले. जातिभेद मोडण्यासाठीचा हा कृतिशील प्रयत्न होता. वरच्या जातीने खालच्या जातीतील कुटुंबाशी वैवाहिक संबंध जोडून जातिभेद मोडले पाहिजेत, असे महाराजांना वाटे. म्हणून जातिभेद मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न महाराजांनी आपल्या घरापासून सुरू केला. महाराजांच्या कागलकर घाटगे या जनक घराण्यातील काकासाहेब महाराज घाटगे यांची कन्या चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी ठरविला. महाराजांनी हा विवाह ठरविला; पण समारंभ घडवून आणण्यास दुर्दैवाने शाहू महाराज जिवंत राहिले नाहीत. 6 मे 1922 रोजी त्यांचे अकाली निधन झाले. पण होळकर-घाटगे विवाह 9 फेब्रुवारी 1924 रोजी इंदुरमुक्कामी मोठ्या थाटाने पार पडला. हा समारंभ शाहू महाराजांच्या इच्छेनुसार पार पाडण्यास आईसाहेब महाराज, आक्कासाहेब महाराज यांनी पुढाकार घेतला. आईसाहेब महाराजांनी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा पुढे जोमाने चालविल्याचे दिसून येते.

6 मे 1922 रोजी सकाळी 6 वाजता वयाच्या 48 व्या वर्षी राजर्षी शाहू छत्रपतींचे मुंबई येथे अकाली निधन झाले. आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूमुळे सर्व कोल्हापूर संस्थान शोकाकुल झाले. या महापुरुषाचे दर्शन घेण्यासाठी सर्व प्रजा रस्तोरस्ती बसून राहिली होती. बापूसाहेब घाटगे यांनी महाराजांचा मृतदेह मोटारीने पुणे-सातारा मार्गे आणला. त्या मार्गावर हजारो लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून छत्रपतींना आदराने वंदन केले. कोल्हापुरात नव्या राजवाड्यावरून राजवैभवी मानसन्मानासहित प्रचंड मोठी अंत्ययात्रा स्मशानापर्यंत जावयास निघाली. ती प्रचंड स्मशान यात्रा हजारो गरीब, श्रीमंत लोकांसहित स्मशानभूमीत 7 मे रोजी पहाटे 5.30 वाजता पोहोचली. कोल्हापुरातच नव्हे, तर तमाम महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट कोल्हापूरच्या ‘त्या’ स्मशानभूमीत घडली; ती म्हणजे शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थ्यांना छत्रपतींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांच्या ऐवजी मराठा पुरोहित म्हणून बोलवण्यात आले. हा निर्णय घेण्यात राजाराम छत्रपती आणि विधवा महाराणी लक्ष्मीबाई यांनी अलौकिक धैर्य दाखविले.

वैदिक स्कूलमधून तयार झालेल्या ब्राह्मणेतर पुरोहितांकडून छत्रपतींसारख्या संस्थानिकाचा अंत्यविधी होण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता. महाराजांच्या आकस्मिक मृत्यूने शोकसागरात बुडालेल्या महाराणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती राजाराम महाराजांना आज कोणत्या दिशेने पाऊल टाकावयाचे, हे ठरविणे भाग पडले. पूर्वपरंपरेला धरून ब्राह्मण पुरोहितांकडून हा विधी करवावयाचा की, एकदम नवीन दिशेने पाऊल टाकून छत्रपती शाहू महाराजांच्या मताप्रमाणे ब्राह्मणेतर पुरोहितांकडून हे गंभीर कार्य पार पाडावयाचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. एका बाजूने हजारो वर्षांची रुढी त्यांना धमकावीत होती; तर दुसऱ्या बाजूने छत्रपती शाहू महाराजांची स्मृती त्यांना उत्तेजित करीत होती. ‘काहीही होवो, मी माझ्या पतीच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहीन,’ असा महाराणी साहेबांनी निश्चय केला. अशा प्रसंगी आजपर्यंत मी-मी म्हणणारे पुष्कळ सुधारक कर्तव्यच्युत झाले आणि जन्मभर प्रतिपादिलेल्या सुधारणांवर अखेर त्यांनी पाणी सोडले; पण याबाबत राजाराम छत्रपती आणि महाराणी लक्ष्मीबाई यांनी अलौकिक धैर्य दाखवून मोठ्या सुधारकांना सुद्धा तत्त्वनिष्ठेने धैर्याच्या दृष्टीने मागे टाकले. धन्य तो सुपुत्र आणि धन्य ती पतिनिष्ठ महाराणी. शिवाजी वैदिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रांनी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यास प्रारंभ केला आणि ते दुःखदायक संस्कार पूर्ण झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या मृतदेहाला 48 तोफांची सलामी देण्यात आली. शाहूराजे अनंतात विलीन झाले, अमर झाले. एका राजावर अंत्यसंस्कार मराठा पुरोहितांनी केले, याचा अर्थ जनतेवरील ब्राह्मण पुरोहित व त्यांच्या पाठिराख्यांचे वजन संपुष्टात आल्याची ती ग्वाहीच होती. (धनंजय कीर – राजर्षी शाहू छत्रपती, पृ. 525) अशा शब्दांत शाहू चरित्रकार धनंजय कीर यांनी या दुःखद प्रसंगी महाराणींनी दाखविलेल्या धैर्याचे कौतुक केले आहे.

छत्रपती राजाराम महाराजांच्या 26 व्या वाढदिवसप्रसंगी राजमाता श्री लक्ष्मीबाई आईसाहेब महाराज यांच्या हस्ते श्री शाहू वैदिक विद्यालय सुरू करण्यात आले. रविवार बुरुजाजवळील इमारतीत सुरू केलेल्या या शाहू वैदिक विद्यालयाचे अनावरण महाराणी लक्ष्मीबाईंच्या हस्ते करण्यात आले. श्री शिवाजी वैदिक विद्यालय छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केले होते. त्याचा उपयोग समाजाला चांगला होता. पण परगावहून धार्मिक विधींचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असत. त्यांची सोय करण्यासाठी नवीन विद्यालय उघडण्यात आले.

‘श्री आईसाहेब महाराजांनी आपल्या सद्गुणी पुत्राकडून या संस्थेला कायमची आठ हजार रुपयांची उदार देणगी सुरुवातीपासूनच देवविली, याबद्दल उभयता माता-पुत्रांची ही संस्था कायमची ऋणी आहे. त्याचप्रमाणे हल्ली विद्यालय ज्या इमारतीत आहे, ती इमारतही विद्यालयासाठी बक्षीस देण्यात आली,” असा उल्लेख ‘राजर्षी शाहू वैदिक विद्यालय कोल्हापूर’ या संस्थेच्या प्रथम वार्षिक अहवालात कृतज्ञतापूर्वक केला आहे. (शाहू वैदिक विद्यालय, प्रथम वार्षिक अहवाल 1922-23, पृ 5, 6)

आईसाहेब महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांच्या योजना व त्यांनी घालून दिलेली तत्त्वे त्यांच्या पश्चात तंतोतंत पाळल्याचे व अनेक गोष्टींमध्ये धीरोदात्तपणे खंबीर राहून महाराजांची तत्त्वप्रणाली जोपासल्याचे दिसून येते. राजाराम महाराजांचा राज्याभिषेक क्षात्रजगद्गुरूंच्या हस्ते करवून घेतला, ही गोष्टही महत्त्वाची आहे.

पुढील काळात कोल्हापूर दरबारतर्फे गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी दरसाल अकरा हजार रुपयांच्या शिष्यवृत्त्या ठेवण्यात आल्या. राजाराम कॉलेजमधील विद्यार्थिनींना व अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सोय केली. मुलींच्या शिक्षणाची वाढ व्हावी म्हणून ‘श्री महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल’ सुरू केले. त्यामुळे महिलावर्गात शिक्षणाची अभिरुची निर्माण होण्यास चांगलीच मदत झाली व त्या प्रमाणात इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संस्थेत वाढ झाल्याचे आढळून आले. (छत्रपती राजाराम चरित्र, पृ. 43.)

12 मार्च 1945 रोजी आईसाहेब महाराज यांचे निधन झाले. ‘साप्ताहिक प्रजा’मधून त्यांना पुढील शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली. – “आईसाहेब महाराज यांचा कोल्हापूरची महाराणी व राजमाता म्हणून 54 वर्षांहून अधिक संबंध आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणांच्या कामात त्या सहभागी होत्या. धार्मिक विधी मराठा पुरोहितांकडून करवून घ्यावेत ही विचारसरणी अमलात आणण्यासाठी त्यांनी हातभार लावला. सामाजिक सुधारणेला व जातिभेद निर्मूलनाला त्यांचा किंचितही विरोध नव्हता. छत्रपतींच्या वाड्यातील पाकशाळेपर्यंत स्पृश्यांप्रमाणेच अस्पृश्यांनाही निःसंकोचपणे वावरता येत असे. अस्पृश्यतेची भावना त्यांच्या मनात कधीही शिवली नाही. सामाजिक सुधारणेला एखाद्या व्यक्तीचाच नव्हे, तर संपूर्ण राजघराण्याचा सक्रिय पाठिंबा असल्याचे हे उदाहरण आहे.” (साप्ताहिक प्रजा 13 मार्च 1945)

‘आद्य शाहू चरित्र’कार अण्णासाहेब लठ्ठे यांनी, छत्रपती शाहू महाराजांचे चरित्रात महाराणी लक्ष्मीबाईंच्या कार्याची नोंद पुढील शब्दांत घेतली आहे. हे चरित्र त्यांनी महाराणी लक्ष्मीबाईंना अर्पण केले आहे –

“कै. महाराजांच्या पत्नी या नात्याने या पुस्तकात वर्णिलेल्या लोकोपयोगी कामातील बराचसा भाग आपला आहे. विशेषतः पतिनिधनोत्तर त्या कामाची जबाबदारी आपले सपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराज यांच्या बरोबरच आपणावर आली. धैर्याने, निश्चयाने आणि करारीपणाने आतापर्यंत आपण आपल्या पतीच्या आवडत्या कार्याचे निशाण हाती धरिले आहे, आणि यावरून कै. महाराजांचे, कोल्हापूरच्या राज्याचे वैभव वाढविण्याचे आणि समाजोद्धाराचे कार्य आपण अधिकाधिक यशस्वी कराल, अशी सर्वांप्रमाणेच मला उमेद वाटत आहे. (शाहू महाराज यांचे चरित्र-अपर्ण पत्रिका)

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कार्याचे निशाण महाराणी लक्ष्मीबाईंनी जीवनभर आपल्या हाती धरले. कोल्हापूरच्या मध्यभागी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर असलेला आईसाहेब महाराजांचा पुतळा त्यांच्या कार्याची साक्ष आजही देत आहे.

- करवीर , कोल्हापूर

वेदोक्त वाद संपादन

मुख्य लेख: वेदोक्त प्रकरण

राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. [७] [८] त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले. [९] [१०]

कार्य संपादन

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.[११]

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनीइतिहासकारांनी केलेला आहे

महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.[ संदर्भ हवा ]

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.[ संदर्भ हवा ]

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.[ संदर्भ हवा ]

जातिभेदाविरुद्ध लढा संपादन

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला,आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला,अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

शैक्षणिक कार्य संपादन

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या.१. प्राथमिक शाळा२. माध्यमिक शाळा३. पुरोहित शाळा४. युवराज/ सरदार शाळा५. पाटील शाळा६. उद्योग शाळा७. संस्कृत शाळा८. सत्यशोधक शाळा९. सैनिक शाळा१०. बालवीर शाळा११. डोंबारी मुलांची शाळा१२. कला शाळा[१२]

शैक्षणिक वसतिगृहे संपादन

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)४. मुस्लिम बोर्डिंग (१९०६)५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८)६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)१२. आर्यसमाज गुरुकुल (१९१८)१३. वैश्य बोर्डिंग (१९१८)१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९)१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०)१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०)१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१)१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१)१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०)२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०)२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०)२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०)२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०)२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९)२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०)२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)

[१३]

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये संपादन

शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. [ संदर्भ हवा ]

कलेला आश्रय संपादन

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान संपादन

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

जन्मतारीख प्रकरण संपादन

२००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४ आहे. यामध्ये प्रा. हरी नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.[१४][१५][१६][१७]

शाहूंवरील प्रकाशित साहित्य संपादन

  • 'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)[१८]
  • राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
  • शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
  • बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
  • राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
  • राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
  • कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
  • राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली))
  • छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली))
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)
  • राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)
  • समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
  • शाहू (लेखक : श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
  • ‘प्रत्यंचा: जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
  • लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका संपादन

  • 'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
  • राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

पुरस्कार संपादन

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे :-

  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
  • कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

सन्मान संपादन

  • शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात.
  • कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात दिला जातो.[१९]

शाहू महाराजांबद्दल व्यक्त केलेली मते संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष' राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती". Maharashtra Times. 2022-01-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Shahu Chhatrapati Biography – Shahu Chhatrapati Life & Profile". Cultural India. 15 May 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Chatrapati Shahu Maharaj (Born on 26th June)". Mulnivasi organiser. 6 May 1922. Archived from the original on 2016-06-16. 15 May 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Date, Vidyadhar (22 July 2002). "Gov seeks total make-over of Chhatrapati Shahu Maharaj's image". The Times of India. 15 May 2016 रोजी पाहिले.
  5. ^ भगत, रा. तु. (२०१६). राजर्षी शाहू छत्रपती - जीवन व शिक्षणकार्य. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन्स. pp. ४१-१४२.
  6. ^ जाधव, नरेंद्र (१९८०). महाराष्ट्रातील मानचिन्हे. पुणे: मॅजेस्टिक प्रकाशन.
  7. ^ Kashinath Kavlekar (1979). Non-Brahmin Movement in Southern India, 1873–1949. p. 63.
  8. ^ Mike Shepperdson, Colin Simmons (1988). The Indian National Congress and the political economy of India, 1885–1985. p. 109.
  9. ^ "Pune's endless identity wars". Indian Express. 1 August 2015 रोजी पाहिले.
  10. ^ Rajarshi Shahu Chhatrapati Papers: 1900–1905 A.D.: Vedokta controversy. Shahu Research Institute, 1985 – Kolhapur (Princely State). 1985.
  11. ^ नांदेडकर, प्रा. डॉ. व. गो. (२०११). राजकीय विचार आणि विचारवंत. पुणे: डायमंड पब्लिकेशन्स. pp. २७०. ISBN 978-81-8483-348-5.
  12. ^ भगत, प्राचार्य रा. तु. (२०१६). राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. २२० - २४८.
  13. ^ भगत, प्राचार्य रा. तु. (२०१६). राजर्षी शाहू महाराज - जीवन व शिक्षणकार्य. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन, कोल्हापूर. pp. २५८ - २७७.
  14. ^ "26 जुलाई को नहीं 26 जून को मनाएं शाहू जी महाराज की जयंती". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2021-06-27 रोजी पाहिले.
  15. ^ "शाहू महाराज का जन्म दिन ईद-दीवाली की तरह मनाओं -डॉ आंबेडकर" Check |url= value (सहाय्य). राष्ट्रीय भारत समाचार (हिंदी भाषेत). 2020-06-26. 2021-06-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  16. ^ नरके, Prof Hari Narke प्रा हरी (2020-06-29). "प्रा. हरी नरके: छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके". प्रा. हरी नरके. 2021-06-27 रोजी पाहिले.
  17. ^ "शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. हरी नरके" (इंग्रजी भाषेत). 2019-06-26. Archived from the original on 2021-06-27. 2021-06-27 रोजी पाहिले.
  18. ^ "दोन महापुरुषांचा पत्रबंध!". Maharashtra Times.
  19. ^ "राजर्षी शाहूंचा विचार पुढे न्या". २७ जून २०१८ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: संभाजी भोसलेक्लिओपात्रासंभाजी राजांची राजमुद्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेविशेष:शोधामुखपृष्ठद्रौपदीपुणे लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रमुरघासबाबासाहेब आंबेडकरअहमदनगर लोकसभा मतदारसंघदिशाजनावरांचा चाराखासदारबीड लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वभारताचे संविधानलोकसभामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ२०२४ लोकसभा निवडणुकामटकामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रशिर्डी लोकसभा मतदारसंघमराठी भाषाविकिपीडिया:संदर्भ द्याज्ञानेश्वरअप्पासाहेब धर्माधिकारीशिरूर लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)पसायदानशिवाजी महाराजांची राजमुद्रासंत तुकारामसंभाजी महाराजांचे साहित्य